समर्थांनी स्थापन केलेले ११ मारुती
समाजाला बलोपासनेचे महत्त्व पटवून देत समर्थांनी सातारा, सांगली आणि कोल्हापूर परिसरात ११ मारुती मंदिरांची स्थापना केली. मारुतीचं का निवडला? कारण शक्तीचं प्रतीक आहे !
‘शुभमंगल सावधान’ हे शब्द कानी पडताच राणूबाईंच्या नारायणाने जी धूम ठोकली, ती त्यांच्या पायाला भिंगरीचं लागली, आणि ते पुढे आयुष्यभर भटकंतीच करीत राहिले. एकाच ठिकाणी कायमस्वरूपाची वस्ती करून राहायचे नाही, भटकत राहायचे, संपूर्ण देश पालथा घालायचा या एकाच उद्देशाने ते अक्षरश: देशभर हिंडत राहिले.
नारायणाचा रामदास झाला आणि रामदासाचे समर्थ झाले, तरीसुद्धा त्यांची देशभर भटकंती चालूच होती. अवघ्या विश्वाची चिंता लागून राहिलेले समर्थ भटकत होते, फिरत होते, समाजाचा मानस समजून घेत होते.
देश भ्रमण केल्यावर त्यांच्या मनातली देशप्रेमाची खुमखुमी त्यांना गप्प बसू देत नव्हती. त्यांना सह्यद्रीची लागलेली ओढ अनावर करीत होतीच. सह्याद्रीचे अलौकिक नैसर्गिक सौदंर्य मुळात आहेच असे. एकदा का माणूस त्याच्या प्रेमात पडला की, त्याच्या रौद्र, राकट सौंदर्याची भुरळ माणसावर पडणारच.
दऱ्याखोऱ्या, गुहा, लेण्या आणि गड किल्ले ही सह्यद्रीची नैसर्गिक साधन संपत्ती माणसाला मोहवून टाकते. गोष्टींमुळेच समर्थांना सह्यद्रीकडची ओढ लागली होती. याच सह्यद्रीच्या कुशीत आपल्या पंताची स्थापना करायची. तरुणांचे संघटन करून त्यांना प्रोत्साहन द्यायचे, त्यांना बलोपासानेचे व्यसन लावायचे आणि आपल्या हृदयातल्या मारुतीला तरुणांसमोर मूर्तीरूपाने उभे करायचे.
नेमके त्याच वेळी सह्यद्रीच्याच साथीने शिवाजी महाराज आणि त्यांच्या जिवलगांनी आदिलशाहीसमोर मोठे आव्हान उभे केले होते. स्वराज्य निर्मितीची भावना लोकांच्या मनात खोलवर रुजवली होती. स्वराज्याचे वारे वाहू लागले होते. यावेळी समर्थ महाबळेश्वर येथे आले होते. हे ठिकाण उंच जागेचे, निसर्गरम्य, पाच नद्यांचा उगम असणारे, घनदाट जंगलं, असंख्य वनस्पतीं, प्राचीन देवालये, आणि नीरव शांततेने भरलेले होते.
जर आपण आपल्या कार्याला इथून सुरुवात केली तर आपल्या या कार्याचा संदेश या पाचही नद्या महाराष्ट्रभर पोचवतील. आपल्या कार्याचा धर्मध्वज अशाच उंच ठिकाणावरून फडकवायला हवा. सह्याद्रीतून मिळालेली स्फूर्ती आणि महाबळेश्वरने दिलेला कौल यांच्या साक्षीने समर्थांनी त्यांच्या कार्याची गर्जना केली.
सातारा तालुक्यातील जरंडेश्वरच्या डोंगरावरील मारुतीचे दर्शन घेऊन समर्थांनी त्यांच्या कार्यास सुरूवात केली. जरंडेश्वरच्या मारुतीसमोर उभे राहिल्यावर समर्थांना एकदम स्फुरले, की बलोपासना आणि समर्थ संप्रदायाची सुरुवात करताना तरुणांसमोर शक्तीचे प्रतीक असलेल्या ११ मारुतीची स्थापना करायची.
सातारा, सांगली, आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत समर्थ रामदासांनी हे ११ मारुती स्थापन केले. आपण एका किंवा दोन दिवसांत या ११ मारुतीचे दर्शन घेऊ शकता. चांगले रस्ते आणि दळवळणाच्या चांगल्या सुविधा असल्यामुळे आपल्याला ११ मारुतीच्या दर्शनाला जाणे अगदी सोयीचे झालेले आहे. समर्थ रामदास स्वामींनी ११ मारुतीचे दर्शन घेण्यासाठी कोणत्याही दर्शनाची क्रमवारीचे अवडंबर माजवले नाही.
जशी अष्टविनायक दर्शनासाठी क्रमवारी ठरलेली आहे तशी कोणतीही क्रमवारी इथे ११ मारुतीच्या दर्शनासाठी दिसत नाही. समर्थांनी त्या त्या जागी बलोपासनेसाठी मारुतींची स्थापना केलेली आहे. भौगोलिकदृष्टय़ा ज्यांना जसा सोयीचा प्रवास वाटेल तसा त्यांनी विचार करावा.
समर्थ रामदास स्वामी स्थापित अकरा मारुती मंदिरे व ११ मारुती दर्शन यात्रा । Samarth Ramdas Swami established eleven Maruti temples and 11 Maruti Darshan Yatras
१ शहापूरचा मारुती
मसूर गावापासून ३ किमी अंतरावर, मसूर-कराड रस्त्यावर शहापूर फाटा लागतो. हे मारुती मंदिर रस्त्यापासून अवघ्या एक किमी अंतरावर नदीकिनारी आहे. समर्थांनी स्थापित केलेल्या ११ मारुतींपैकी हा पहिला मारुती असल्याचे मानले जाते. शके १५६६ म्हणजेच समर्थांनी या मारुतीची स्थापना इस. १६४५ मध्ये केली. या मारुतीला 'चुन्याचा मारुती' असेही म्हणतात. गावाच्या एका टोकाला नदीकाठी मारुती मंदिर आहे.
मंदिर आणि मंदिरातील मारुतीची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. सुमारे सहा फूट उंचीची असून, मूर्तीचे रूप काहीसे उग्र दिसते. मूर्तीच्या डोक्यावर गोंडाची टोपी दिसते. समोर एक पितळेची उत्सवाची छोटी मूर्ती दिसते. शहापूरचे आणखी एक महत्त्व म्हणजे रांजण खिंड, हे शहापूरच्या अग्नेय दिशेस २ किमी अंतरावर आहे. इथे आपण दगडाचे दोन मोठे रांजण पाहू शकता. या खिंडी जवळील टेकडीवर समर्थ राहत असत.
शहापूर समर्थ बाजीपंत कुलकर्णी यांची एक सुंदर कथा येथे प्रसिद्ध आहे. आदिलशाही प्रांतात शहापूरजवळ चंद्रगिरी नावाची टेकडी आहे. समर्थ रामदास या डोंगरावर तपश्चर्यासाठी जात असत. त्यावेळी ते तेथून भीक मागायला शहापूर गावी जायचे. बाजीपंत कुलकर्णी नावाचा एक गृहस्थ गावात राहत असे. त्यांच्या बायकोचे नाव सईबाई होते.
समर्थ जेव्हा भीक मागायला यायचे, तेव्हा सईबाई नाकमुरडून बोलत असत की, "हा गोसावडा नेहमीच आमच्याकडे भीक मागायला येत असतो ." एके दिवशी समर्थ जेव्हा भीक मागायला बाजीपंतांच्या घरी आले, तेव्हा त्यांना घरातील वातावरण उदास दिसले. समर्थांना, चौकशीदरम्यान बालाजीपंतला फसवणूकीच्या आरोपाखाली अटक करून विजापूर येथे नेण्यात आल्याची माहिती मिळाली.
समर्थांनी सईबाईंना ग्वाही दिली की, आजपासून पाच दिवसांनी बाजीपंत घरी परततील. दासोपंतानी (म्हणजे समर्थ) विजापूरला जाऊन लेखाजोखा मिटविला आणि बाजीपंतबरोबर शहापूरला परतले !! त्यानंतर समर्थ गावच्या हद्दीतून गायब झाले, त्यामुळे कुलकर्णी दाम्पत्याने तीन दिवस उपोषण केले.
चौथ्या दिवशी, समर्थ जेव्हा भीक मागायला त्यांच्या घरी आले, तेव्हा मात्र कुलकर्णी दाम्पत्याने समर्थांना रात्रीच्या भोजणासाठी आग्रह केला. त्या दिवसापासून साईबाईंनी फक्त एक व्रत केला, जोपर्यंत समर्थांचे दर्शन होत नाही तोपर्यंत अन्न घ्यायचे नाही.
एकदा आठ दिवसांचा उपवास घडला होता. त्यावेळी हे जोडपे चंद्रगिरी येथे दर्शन घेण्यासाठी गेले. तेथे समर्थांसाठी स्वयंपाक केला. सईबाईंनी समर्थांना जेवण वाढण्याचा आग्रह केला. परंतु समर्थ ज्याखोलीत जेवण करायाचे तिथे कोणीही जात नव्हते. सईबाईंना समर्थांनी इशारा दिला होता की, जेवण वाढत असताना खाली बघून वाढायचे वर बघायचे नाही.
तरीही, सईबाईचे लक्ष नकळत वर गेले आणि तिचे डोळे तेजाने दिपून गेले व ती बेशुद्ध पडली. असे म्हणतात की समर्थांच्या जागी तिला खऱ्या मारुतीचे दर्शन झाले. नंतर समर्थांनी येथे चुनखडीच्या मारुतीची स्थापना केली आणि मंदिर बांधले. कुलकर्णी नावाचा एक गृहस्थ अजूनही मोठ्या उत्साहाने येथे सेवा करीत आहे. त्याचे घर मंदिराजवळच आहे.
हे वाचा : पंढरपूर, अक्कलकोट, आणि तुळजापूर दर्शन यात्रा कमी वेळेत कमी बजेटमध्ये कशी करावी
२ मसूरचा मारुती
समर्थांनी उंब्रजपासून अवघ्या दहा किमी अंतरावर मसूर येथे मारुतीची स्थापना केली आहे. मसूर गावाशी निगडित एक कथा समर्थ स्वामींचा शिष्य कल्याणस्वामीशी निगडित आहे.
कल्याण हा समर्थांचा मोठा शिष्य होता. समर्थांना मसूर येथील महोत्सवात कल्याणची प्राप्ती झाली होती आणि नंतर पुढे तो समर्थांचा प्रिय शिष्य झाला. कल्याणस्वामींचे मूळ नाव अंबाजी होते. चार वर्षांपासून समर्थांनी मसूरमध्ये राम नवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करीत होते.
एक वर्ष प्रभूरामचंद्रांच्या मिरवणुकीच्या वेळी मिरवणूक मार्गावर एका झाडाची फांदी आडवी येत होती. मग समर्थांनी अंबाजी नावाच्या युवकास फांदीच्या शेंड्यावर बसून ती फांदी कुऱ्हाडीने बुंद्याच्या बाजूने तोडायला सांगितली. अंबाजींने कुठलाही विचार ना करता.
ती फांदी तोडली आणि अंबाजी फांदीसहित सरळ खाली असलेल्या खोल विहिरीत जाऊन पडला. समर्थ विहिरीजवळ आले, आत विहिरीत डोकावून पहिले आणि विचारले, ‘अंबाजी कल्याण आहे ना?’ विहिरीतून प्रतिउत्तर आले, ‘स्वामी सर्व काही कल्याण आहे.’ तेंव्हापासून अंबाजीचा कल्याण झाला.
पाच फूट उंचीची, चुन्यापासून बनवलेली आणि पूर्वाभिमुख ही मारुतीची मूर्ती, सर्व ११ मारुतींपैकी सर्वात देखणी म्हटले पाहिजे. शके १५६८ म्हणजेच इस. १६४५ मध्ये स्थापन केली गेली. अतिशय सौम्य आणि आनंदी मुद्रा असलेल्या मूर्तीच्या डोक्यावर मुकुट असून गळ्यात माला, जानवे, कमरेला मेखला अशा थाटात सजवलेली दिसते.
हाताची बोटं तसेच लंगोटीचा काठ अतिशय आकर्षक पद्धतीने त्यांचे रंगकाम केलेले दिसते. जंबुमाळी नावाच्या राक्षसाचे पायाखाली मर्दन केलेले दिसते. मूर्तीच्या एका बाजूला शिवराम आणि दुसर्या बाजूला समर्थांचे चित्र आहे. याच गाभाऱ्याच्या एका भिंतीवर चित्र काढलेले दिसते. या मंदिराला १३ फूट लांबीरुंदीचा सभामंडप आहे. मंदिराच्या छताला सहा दगडी खांबांवर ठेवलेले आहे. मंदिराशेजारी नारायण महाराजांचा मठ आहे. या मंदिराचे व्यवस्थापन श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्याकडे आहे.
इथली आणखी एक कथा सांगितली जाते, ती म्हणजे मुसळराम नावाचा कुस्तीगीर होता जो नेहमीच आपल्या खांद्यावर एक मुसळ घेऊन फिरत असे. समर्थांनी मुसळरामाला इथला मठाधीश बनविला. असं म्हटलं जातं की मुसळरामाला ठार करण्याचा इरादा असलेल्या यवानी अधिकाऱ्याला समर्थांनी बेदम मारहाण केली होती.
३ चाफळचा दास मारुती
सातारा-कराड रस्त्यावर उंब्रज गावात चिपळूणकडे जाणारा फाटा आहे. तिथून उजवीकडे वळून पुढे जाणारा रस्ता चाफळला जातो. चाफळ उंब्रजपासून अवघ्या ११ किमी अंतरावर आहे. शके १५५९ म्हणजेच इ.स. १६४८ मध्ये अंगापूर येथील डोहात सापडलेल्या राम मूर्तीच्या स्थापनेसाठी समर्थांनी चाफळ येथे एक सुंदर मंदिर बांधले.
या राम मंदिरासमोर हात जोडलेला दास मारुती आणि १६४९ मध्ये मंदिराच्या पाठीमागे प्रताप मारुतीची स्थापना केली. रामाच्या समोर नम्रतेने हात जोडून उभ्या असलेल्या मारुतीची मूर्ती सहा फूट उंचीची आहे. जणू काही या मारुतीचे डोळे भगवान रामाच्या चरणी स्थिर आहेत. १९६७ मध्ये कोयना भूकंपामुळे राम मंदिराचे नुकसान झाले. परंतु असे म्हणतात की या मारुती मंदिराचे कोणतेही नुकसान झाले नाही.
हे वाचा : श्री स्वामी समर्थ - अक्कलकोट
४ चाफळचा प्रताप मारुती / वीर मारुती
चाफळच्या श्रीराम मंदिराच्या मागे तुम्हाला सुमारे १०० मीटर चालत जावे लागेल. रामदास स्वामींनी बांधलेले मारुती मंदिर आजही अबाधित आहे. मंदिरातील मारुतीची मूर्ती रामदासांनी त्यांच्या भीमरूपी स्तोत्रात वर्णन केल्याप्रमाणेच आहे. त्याची शेपटी डोक्यापर्यंत वाकलेले आहे, त्याच्या कंबरेला सोन्याचा कासोटा आहे, त्याच्यावर घंटा किणकिणत आहे, नेटका, सडपातळ, डोळ्यांतून जणू आग बरसत आहे अशा रुद्र मुद्रेत आहे.
मूर्ती अधिक पातळ आहे आणि त्याच्या पायाखाली एक राक्षस आहे. येथे आपणास वेगवेगळ्या स्वरूपाच्या दोन सुंदर मारुतीच्या मूर्ती पाहायला मिळतात. चाफळ हे समर्थ संप्रदायाचे मुख्य केंद्र असल्याने समर्थांनी येथे दोन मारुतींची स्थापना केली असेच दिसते.
हे वाचा : आनंद सागर शेगाव
५ शिंगणवाडीचा मारुती
त्याला खडीचा मारुती, बालमारुती, चाफळचा तिसरा मारुती असेही म्हणतात. चाफळपासून अवघ्या एक किमी अंतरावर शिंगणवाडीची टेकडी आहे. तिथे समर्थांच्या ध्यानासाठीचे रामघळ हे ठिकाण आहे. त्याच ठिकाणी शके १५७१ म्हणजेच इस. १६५० मध्ये समर्थांनी मारुतीची एक छोटी सुंदर मूर्तीची स्थापना केली.
साधारणतः चार फूट उंचीची मूर्ती उत्तरेकडे तोंड केलेली असून डाव्या हातात ध्वज दिसत आहे. उजवा हात उंच उगारलेला अवस्थेत दिसत आहे. या मंदिराची सहा फूट लांबीरुंदी असून हे मंदिर ११ मारुतींपैकी सर्वात लहान आहे. या मंदिरात सभा मंडप नाही परंतु घनदाट वृक्षांनी वेढलेले आहे.
डोंगराच्या पश्चिमेस एक ओढा आहे आणि तिथेसुद्धा ओढ्याचे काठ घनदाट वृक्षांनी गजबजलेले आहेत. हे मंदिर उंचीवर असल्यामुळे मंदिराच्या आणि शिकाराचा तांबडा रंग असल्यामुळे आपण या मंदिराला दुरूनच पाहू शकतो. चाफळच्या आधी समर्थांचा मठ शिंगणवाडी येथे होता.
एखाद्या स्थानाशी संबंधित एखादी कहाणी असल्यास त्या ठिकाणचे महत्त्व आणखीनच वाढते. आणि त्याचे आकर्षण निर्माण करते. शिंगणवाडीचेही हेच आहे, असे म्हणतात की शिवाजी महाराज आणि समर्थ इथल्या चिंचेच्या झाडाखाली भेटले होते. त्याच प्रमाणे महाराजांची तहान भागविण्यासाठी समर्थांनी कुबडीने एक दगड पलटविला आणि त्याच्या खालच्या पाण्याचा प्रवाह वाहता केला, या जागेला 'कुबडीतीर्थ' असे नाव पडले.
हे वाचा : पंढरपूर दर्शन
६ उंब्रजचा मारुती
उंबराजच्या मारुतीला मठातील मारुती असेही म्हणतात. या मारुती मंदिराशी आणि उंब्रजशी जोडलेल्या काही कथा आहेत. तुम्हांस माहीत असेलच की, आपल्याकडे जेवढीपण काही तीर्थ क्षेत्रे आहेत, तेथे कोणती ना कोणतीतरी कथा जोडलेली असतेच. त्या कथेमुळे त्या ठिकाणी रंजकता निर्माण करते. आपण तिथे गेलो आणि ती विशिष्ट कथा आठवली की, आपल्याला आनंदाचा वेगळाच अनुभव मिळतो.
समर्थ चाफळहून उंब्रजला रोज आंघोळीसाठी येत असत. एकदा ते इथल्या नदीत अंघोळ करताना पाण्यात बुडाय लागल्यामुळे 'मेलो मेलो' असे जोरजोरात ओरडू लागले. तेंव्हा मारूतीनेच त्यांना बाहेर काढले होते असे लोक म्हणतात. मारुतीच्या पायाचा एक ठसा तिथल्या खडकावर उमटल्याचे दाखवले होते. आता तो दगड वाळूमध्ये बुजून गेला अशी ही इथली आख्यायिका आहे.
समर्थ रामदास यांना बक्षीस म्हणून उंब्रज येथे काही जमीन मिळाली होती. म्हणून त्यांनी तेथे मारुती मंदिर बांधले आणि मठाची स्थापना केली. शके १५७१ म्हणजेच इस. १६५० मध्ये समर्थांनी येथे मारुती मंदिर बांधले. चुना, वाळू आणि ताग याचा वापर करून ही मूर्ती तयार केली, सुमारे दोन फूट उंच असून ही मूर्ती खूपच सुंदर आहे.
सध्या मात्र या मूर्तीला चंदेरी डोळे बसवलेले आहेत. मारुतीच्या पायाखाली एक राक्षस दिसतो. रामदासस्वामी यांनी मूर्ती स्थापनेनंतर सलग १४ दिवस येथे कीर्तन केले. त्यानंतर शिराळ्याचे देशपांडे त्यांना त्यांच्या घरी घेऊन गेले.
७ माजगावचा मारुती
हा मारुती चाफळपासून फक्त ३ किमी अंतरावर असून त्याचे एक वैशिष्ट्य आहे. समर्थांनी या दगडाला मारुतीचे रूप दिले जो दगड जो ग्राम रक्षक दगडाच्या रूपात होता. माजगावच्या वेशीवर घोड्याच्या आकाराचा दगड होता.
ग्रामस्थांच्या आग्रहामुळे समर्थांनी शके १५७१ म्हणजेच इस. १६५० मध्ये या दगडावर मारुतीची प्रतिमा कोरली. हि मारुतीची मूर्ती पाच फूट उंचीची असून चाफळच्या राममंदिराकडे पश्चिम दिशेला तोंड करुन उभी आहे.
सुमारे १०० चौरस फूट लांब आणि रुंदीचे, कौलारू, वीट-मातीचे मूळ मंदिर आता जीर्णोद्धार झाल्यावर खूप वेगळे दिसते. फरशांची जमीन, मंदिराशेजारी ध्वज, सुंदर दरवाजा, रंगकाम हे सद्याच्या मंदिराचे रूप आहे. मंदिरातील एका भिंतीवर हनुमानाने द्रोणागिरी पर्वत उचलून नेत असल्याचे चित्र पाहायला मिळते. चाफळचे श्रीराम देवस्थानच या मंदिराचे व्यवस्थापन करते. सध्या या मंदिरात शाळा भरते.
हे वाचा : सदगुरु श्री संत बाळूमामा समाधि मंदिर
८ बहे बोरगावचा मारुती
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात बाहे किंवा बहे हे गाव आहे. कराड-कोल्हापूर मार्गावर असलेल्या पेठवरुन सुमारे १२ किमी अंतरावर स्थित आहे. आपल्याकडे बरीच अशी गावे आहेत की ज्यांची नावे शेजारच्या गावाच्या नावाला जोडून घेतली जातात. तसेच येथे शेजारी बोरगाव असल्यामुळे याला बाहे-बोरगाव म्हणून संबोधले जाते.
येथील प्रसिद्ध आख्यायिका रामायणाशी संबंधित आहे. रावणाचा पराभव केल्यानंतर अयोध्येत परत येत असताना भगवान रामचंद्र कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या बोरगाव येथे थांबले. भगवान रामचंद्र कृष्णानदीच्या पात्रात स्नान करण्यास जात असताना, कृष्णा नदीला उचंबळून आले आणि नदीला अचानक पूर आला.
मारुतीने नदीच्या पात्रात मध्यभागी बसून, त्याने आपले दोन्ही बाहू आडवे धरून नदीच्या पाण्याचा प्रवाह दोन बाजत विभागला त्यामुळे नदीपात्रात मध्यभागी एक बेट निर्माण केले. असे मानले जाते की हनुमंताने नदीचे प्रवाह दोन बाहूंनी विभाजित केल्यामुळे त्या जागेला बाहे / बहे / बहुक्षेत्र असे नाव पडले.
मारुतीचे दर्शन होईल या आशेने या ठिकाणी गेलेल्या समर्थांनी मारुतीचे मूर्तीरूपात दर्शन झाले नाही. म्हणून समर्थांनी मारुतीचा धावा सुरू केला. त्यावेळी समर्थांना पाठीमागे असलेल्या डोहातून ओरडण्याचा आवाज आला. समर्थांनी डोहामध्ये डुबकी मारली आणि डोहातून मारुतीची मूर्ती बाहेर काढून या ठिकाणी स्थापित केली.
ही कथा शके १५७३ अर्थातच इस. १६५२ मध्ये घडली असावी. प्राचीन काळात येथे राम मंदिर होते. त्याच्या समोर शिवलिंग. या राम मंदिराच्या मागे मारुतीची स्थापना केलेली आहे. पाणी अडविण्याच्या पावित्र्यात मारुतीचे दोन हात दिसत असून दोन्ही मांडीच्या बाजूला ठेवलेले दिसत आहेत. डोक्यावर मुकुट असलेली ही एक भव्य मूर्ती आहे.
येथे जाण्यासाठी कृष्णा नदीच्या पुलाच्या पश्चिमेकडील बंदाऱ्यावरून बेटाकडे जाण्याऱ्या रस्त्याने जावे लागते. मात्र, नदीला पूर आल्यास रस्ता बंद होतो त्यावेळी इथे आपण जाऊ शकत नाही.
हे वाचा : महाबळेश्वरमधील ३४ लोकप्रिय पर्यटन स्थळे
९ मनपाडळेचा मारुती
मनपाडळे कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगड-ज्योतिबा परिसरात आहे. पन्हाळगड हे दक्षिणकडील दरवाजासारखेच आहे. शिवाजी महाराजांच्या काळात विजापूरच्या आदिलशाहीवर लक्ष ठेवण्यासाठी पन्हाळगड हे मोक्याचे ठिकाण होते. या भागाचे राजकीय महत्त्व लक्षात घेता असे दिसते की समर्थांनी या ठिकाणी शक्तीची ही दोन केंद्रे तयार केली असतील. कोल्हापूर ते वडगाव वाठार हे अंतर २२ किमी चे आहे.
वडगाव वाठार वरुन पुढे अंबपमार्गे मनपाडळे हे अंतर १४ किमी आहे. ११ मारुतींपैकी सर्वात दक्षिणेकडील या मारुतीची स्थापना समर्थांनी शके १५७३ म्हणेजच इस. १६५२ मध्ये केली होती. साधारण पाच फूट उंचीची साधी सुंदर मारुतीची मूर्ती आणि मंदिर दोन्हींची तोंडे उत्तरेकडे आहेत. मूर्तीजवळ दीड फूट उंचीची कुबडी पाहायला मिळते. ओढ्याकाठी एक सुंदर कौलारू मंदिर असून त्याचा परिसरात मोठ्या प्रमाणांत झाडी आहे. सात फूट औरसचौरस असलेल्या या मंदिराचा नवनिर्मित सभा मंडप खूप मोठा आहे.
वारणा खोऱ्यात मनपाडळे गावाजवळ पाडळी नावाचे गाव आहे. येथेही मारुतीची एक मूर्ती आहे. कोल्हापूरपासून २० किमी अंतरावर ज्योतिबाच्या पायथ्याशी मनपाडळे हे गाव आहे. येथून साधारण ७ किमी अंतरावर असलेल्या पारगावमध्ये आणखी एक सुप्रसिद्ध मारुती आहे.
१० पारगावाचा मारुती
हा बालमारुती किंवा समर्थांच्या झोळीतील मारुती असेही म्हणतात. कराड-कोल्हापूर रस्त्यावर वाठार हे गाव आहे. येथून वाराणा साखर कारखान्याकडे जाणार्या रस्त्यावर नवीन पारगाव आहे. त्याच्या अगदी उत्तरेस जुने परगाव आहे. या जुन्या पारगावात मारुती मंदिर आहे. शके १५७४ म्हणजे इस. १६५४ मध्ये स्थापित केलेला, ११ मारुतीपैंकी सर्वात शेवटी स्थापित केलेला आणि सर्वात लहान मूर्ती आहे.
सुमारे दीड फूट उंच मूर्ती सपाट दगडावर कोरलेली असून त्यावर शेंदूर लावलेला नाही. डोक्यावर मारुतीचे केस बांधलेले दिसत आहेत. मूर्ती अशा पद्धतीने कोरलेली आहे की त्यामुळे मारुती राया डावीकडे धावत आहे असे दिसते.
मूळ गभारा, आठ फूट लांब आणि रुंद होता, १९७२ मध्ये येथे ४० फूट लांब आणि १६ फूट रुंदीचा सभामंडप बांधलेला आहे. मनपडळे ते पारगाव हे अंतर फक्त पाच किमी आहे, परंतु कोणताही सरळ मार्ग नाही. आपल्याला वळसा घालून येथे जावे लागते.
या अकरा मारुतींशिवाय समर्थांनी गोदावरी काठी टाकळी येथे गोमयाचा मारुती स्थापित केला. त्याशिवाय सज्जनगड, शिवथरघळ, मिरज, महाबळेश्वर, वाई, टेंभू, शिरगाव, सिंहगड, तंजावर आणि अगदी हिमालयातील बद्रीनाथ या प्रसिद्ध मंदिरातही मारुतीचा स्थापना केलेली आहे.
विपरीत काळ आलेला असतानासुद्धा ‘धीरधरा धीरधरा तकवा..हडबडू गडबडू नका’ असा संदेश देणाऱ्या समर्थानी तरुणाईमध्ये बलोपासनेचे स्फुर्ती चेतवण्यासाठी सह्य़ाद्रीच्या कुशीत हे अकरा मारुती स्थापन केले.
हे वाचा : महाराष्ट्रातील ३५ सर्वोत्कृष्ट धबधबे
११ शिराळ्याचा मारुती
सांगली जिल्ह्यातील शिराळा हे गाव नागपंचमीच्या सणासाठी प्रसिद्ध आहे. समर्थांनी स्थापलेल्या मारुतीसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे. हे मंदिर एस.टी. स्टॅन्डजवळच आहे. अतिशय भव्य मूर्ती असलेले हे मारुती मंदिर खरोखर सुंदर आहे.
शके १५७६ म्हणजेच १६५५ मध्ये समर्थांनी इथे मारुतीची स्थापना केली. हनुमंताची सात फूट उंच चुनखडीची मूर्ती उत्तरेकडे तोंड करून उभी आहे. मंदिर देखील उत्तराभिमुख आहे. कंबरपट्टया मध्ये घंटा बसविलेली आहे. कमरेची वस्त्रे आणि त्याचा गोंडासुद्धा खूप सुंदर आहे.
मूर्तीच्या डोक्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला झरोके आहेत. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्यावेळी मूर्तीच्या तोंडावर सूर्य प्रकाश पडतो. दक्षिणेकडे मंदिराला अजून एकच दरवाजा असा प्रकार आहे. शिराळ्याचे महादजी सबाजी देशपांडे समर्थांचे शिष्य म्हणून प्रसिद्ध होते.
असे दिसते की या ११ मारुतींची स्थापना इस. १६४५ ते १६५५ या दहा वर्षांच्या कालावधीत झाली. देश आणि समाज यांच्या सद्यस्थितीबद्दल योग्य ते ज्ञान घेऊन समर्थांनी लोकांपुढे शक्तीचे आणि तेजाचे प्रतीक असलेले हे ११ मारुती स्थापन केले. समर्थांनी लोकांना त्यांच्यायोगे बलोपासना करण्यास आणि कोणत्याही संकटाच्या वेळी दृढ उभे राहण्यास प्रेरित केले.
त्या दिवसांत जेव्हा वाहतुकीची साधने कमी पडत असत, तेव्हा मारुतीची सुस्थितीत असलेली जागा संपर्क बिंदू म्हणून वापरली गेली असावी. मला वाटते संपर्कांचे जाळे तयार करण्याचा हा प्रयत्न असावा. आजही या ठिकाणांचे महत्त्व कणभरही कमी होत नाही. आपल्या भटकंतीमध्ये वेगळ्या उद्देशाने केलेली ही भटकंती नक्कीच संस्मरणीय असेल.
सह्याद्रीच्या कुशीतील या ११ मारुतीला कोणत्याही ऋतुत भेट दिलीतरी चालते. पावसाळ्यात जर ते गेलं तर मग उत्तमच आहे. या वेगवेगळ्या ठिकाणी आवश्य भेट दिलीच पाहिजे. येथे दोन घटका शांतपणे बसून इतिहास लक्षात ठेवायला पाहीजे. मारुतीरायासारखी प्रभुरामाप्रती असलेली अनोखी भक्ती वाढवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. या ठिकाणी आल्यावर कोणत्याही संकटाचा सामना न डगमगता करण्याची प्रेरणा आपल्याला मिळते.
हे वाचा : भारतातील २० सुंदर समुद्र किनारे
निष्कर्ष
शेवटी, अकरा मारुती मंदिरांची स्थापना आणि अकरा मारुती दर्शन यात्रांच्या निर्मितीमध्ये परमपूज्य संत आणि अध्यात्मिक नेते समर्थ रामदास स्वामी यांचे गहन समर्पण आणि आध्यात्मिक दृष्टी प्रकट झाली. या पवित्र प्रयत्नांद्वारे, त्यांनी भक्ती, धार्मिकता आणि निःस्वार्थ सेवेची शिकवण पसरवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे असंख्य भक्तांना परिवर्तनात्मक आध्यात्मिक प्रवास सुरू करण्यासाठी प्रेरित केले. ही मंदिरे आणि यात्रा भगवान हनुमानाच्या अनुयायांमध्ये एकतेची आणि भक्तीची भावना वाढवून, विश्वासाचे प्रतीक म्हणून उभी आहेत. समर्थ रामदास स्वामींचा वारसा लोकांचे जीवन समृद्ध करत आहे, आध्यात्मिक वाढीस चालना देत आहे आणि परमात्म्याशी सखोल संबंध वाढवत आहे. त्यांचे हिंदू धर्मातील उल्लेखनीय योगदान पुढील पिढ्यांच्या हृदयाला स्पर्श करणारे प्रेरणा आणि आदराचे चिरंतन स्त्रोत आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
१) ११ मारुतीचे दर्शन काय नावे आहेत?
अकरा मारुती मंदिरे नावे पुढील प्रमाणे
१ शहापूरचे मारुती मंदिर (१६४५)
२ मसूरचे मारुती मंदिर (१६४५)
३ चाफळचे वीर मारुती मंदिर (१६४८)
४ चाफळचे दास मारुती मंदिर (१६४९)
५ शिंगणवाडीचे मारुती मंदिर (१६५०)
६ उंब्रजचे मारुती मंदिर (१६५०)
७ माजगावचे मारुती मंदिर (१६५०)
८ बहे बोरगावचे मारुती मंदिर (१६५२ )
९ मनपाडळेचे मारुती मंदिर (१६५२)
१० परगावचे मारुती मंदिर (१६५४)
११ बत्तीस शिराळ्याचे मारुती मंदिर (१६५५)
२) ११ मारुतीची कहाणी काय आहे?
११ मारुती मंदिरे १७व्या शतकात महाराष्ट्र, भारतामध्ये समर्थ रामदासांनी स्थापन केली. महाराष्ट्रातील तरुणांमध्ये बलोपासनेचे महत्त्व निर्माण करणे हे यामागचे उद्दिष्ट होते जेणेकरून ते छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेल्या मराठा साम्राज्याच्या स्थापनेत सहभागी होऊ शकतील.
३) ११ मारुती दर्शन मार्ग किती लांबीच आहे?
महाराष्ट्रातील अकरा मारुती मंदिर दर्शन यात्रेसाठी तुम्ही कुठून सुरुवात करत आहात याच्यावर तुमचे अंतर अवलंबून असणार आहे. आपण मुंबई कराड रस्त्याचे अंतर ३०८ किमी आहे, जर तुम्ही कराडजवळील उंब्रज येथून प्रवास सुरू केला आणि सर्व मंदिरांना भेटी दिल्या तरी तुमचे एकूण अंतर २५७ किमी एवढे भरेल.
४) महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय हनुमान मंदिर कोणते आहे?
महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय हनुमान मंदिर औरंगाबाद जिल्ह्यातील खुलदाबाद येथील भद्रा मारुती मंदिर आहे. आणि अकरा मंदिरांपैकी सर्वात उत्कृष्ट आणि आश्चर्यकारक मंदिर म्हणजे मसूर येथील महारुद्र हनुमान मंदिर, जे १६४५ मध्ये बांधले गेले.
अस्वीकरण
आमच्या ब्लॉगमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही, मग त्या गूगल इमेजेस, फोटोलिया आणि शटरस्टॉक यांच्याकडून घेतलेल्या असतील. अशा सर्व प्रतिमा त्यांच्या संबंधित मालकांचे कॉपीराइट आहेत आणि आम्ही जिथे जमेल तिथे त्यांना श्रेय देण्याचा प्रयत्न करतो. तथापि, जर आमच्या ब्लॉगवर कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती एकतर आम्हाला प्रतिमा काढून टाकण्यासाठी थेट मेल करू शकते किंवा प्रतिमाचे श्रेय कोणालाही देऊ शकते.
Khup chan mahiti
उत्तर द्याहटवा